मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीबाबत खूप चर्चा होते, मुदत ठेवी कमी होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. मात्र मुदत ठेवीबाबत सध्या चिंता करण्याचे काही कारण नाही, अशी ग्वाही मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.पालिकेने मोठ्या प्रकल्पांसाठी पुढील दोन आर्थिक वर्षांचे नियोजन केले आहे. मात्र या दोन वर्षात पुढील आर्थिक नियोजन केले नाही, तर भविष्यात निधीची चणचण भासू शकते, असा इशाराही पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला.
‘आयडिया एस्चेंज’ कार्यक्रमात मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेशी संबंधित विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.
बँकांचे व्याजदर पाहता या मुदत ठेवीतून फारसा लाभ मिळत नाही. त्यापेक्षा हा निधी लोकोपयोगी प्रकल्पांसाठी वापरणे चांगले आहे. प्रकल्पांसाठी निधी वापराबाबत पुढील दोन आर्थिक वर्षांचे नियोजन केले आहे. मात्र तोपर्यंत उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण झाले नाही तर मात्र भविष्यात निधीची चणचण भासू शकते, असे मत गगराणी यांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षात पालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतात वाढ झालेली नाही. तसेच मालमत्ता करातही वाढ झालेली नाही. त्यामुळे नियोजन करावे लागेल, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले.
