वैमनस्यातून तिघांवर कोयत्याने वार, कासेवाडीतील घटना; सराइतांविरुद्ध गुन्हा

 वैमनस्यातून सराइतांनी तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडी भागात घडली. याप्रकरणी सराइतांसह साथीदारांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजय हरिसिंग परदेशी (वय ४४), जय अनिल परदेशी (वय २१) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सादिक महंमद शेख (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), नूर नजीर शेख, इरफान शेख (दोघे रा. नाडेगल्ली, गणेश पेठ), सलीम कासीम तांबोळी, इम्रान उर्फ इम्मू सत्तार शेख (दोघे रा. कोंढवा) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत सोनू उर्फ माँटी अनिल परदेशी (वय २७, रा. म्हसोबा मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी परदेशी ओळखीचे आहेत. यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. बुधवारी मध्यरात्री आरोपींनी सोनू परदेशी याचे काका अजय आणि लहान भाऊ जय यांना कासेवाडी भागात अडवले. त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी काका आणि लहान भावाला सोडविण्यासाठी गेलेला सोनू याला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींंचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक आकाश थिटे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *