जलप्रदूषण, अत्याधुनिक बोटींनी होणारी मासेमारी, बंदीकाळात बेकायदा मासेमारी, जादा मासेमारी या कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील मासळी उत्पादन कमी होऊ लागले आहे. त्याचबरोबर खाडय़ांमध्ये मिळणा-या काही स्थानिक माशांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. धरमतर खाडीत मिळणारा पाला मासा दिसेनासा झाला आहे. पोशा जातीची कोळंबी, शेवंडी या जाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
पूर्वी नागोठणे परिसरात पाला मासा मोठ्या प्रमाणात सापडायचा. परंतु रासायनिक कारखान्यांचे पाणी खाडीमध्ये सोडल्यामुळे जलप्रदूषणात हा मासा दिसेनासा झाला. करपाली ही मोठय़ा जातीची कोळंबी खाडीमध्ये सापडायची ती देखील आता नष्ट होत आहे. पोशा कोळंबी ही गोडय़ा पाण्यात वाढते. ही कोळंबी प्रजननासाठी निमखा-या पाण्यात येते. अंडी घालून झाल्यानंतर ती पुन्हा गोडय़ा पाण्यात जाते. ही कोळंबी प्रजननासाठी निमखा-या पाण्यात येत असताना पकडली जाते. त्यामुळे तिची पैदास कमी होते. परिणामी पोशा कोळंबीचे प्रमाणही घटले आहे. बोईट खाडीत सापडणारी कोळंबी, जवला या जातीचे मासे कमी मिळू लागले आहेत. पाकट, मुशी, बलदा, बग्गा, करंदी (अंबाड), दांडीसुकट (खाडे) या माशांच्या जाती देखील आता कमी प्रमाणात मिळतात.
जादा मासेमारी करणे, बंदी काळात मासेमारी करणे. पर्ससीन जाळ्यांनी मासेमारी करणे, मोठय़ा प्रमाणात होणारे जलप्रदूषण ही मासळी उत्पादनात घट होण्याची प्रमुख कारणे आहेत. बंदी काळात मासेमारी केल्यामुळे प्रजोत्पादनाच्या काळातच खाडीमध्ये मासे पकडले जातात. त्यामुळे अंडी घातली जात नाहीत. पर्ससीन जाळ्यामुळे सुमारे किलोमीटर परिघात जाळे टाकून मासे पकडले जातात. त्यात माशांची पिल्लेही सापडतात, ती मोठी होण्याआधीच सापडल्यामुळे उत्पादन घटते. कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी खाडय़ांमध्ये सोडल्यामुळे मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यामुळे खाडय़ांमधील स्थानिक माशांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पापलेट, सुरमई, शिंगाडा, घोळ, शेवंड यांचे उत्पादन घटले आहे.