बसमधून पडून १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; धावत्या बसचा दरवाजा अचानक उघडल्याने घटना

तालुक्यातील कंक्राळे येथून करंजगव्हाण येथे शाळेत जाणारी दहावीची विद्यार्थिनी एसटी बसच्या आपत्कालीन दरवाजामधून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

जयश्री हिरामण कन्नौर (वय १६) असे तिचे नाव आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मालेगाव आगाराचे बसचालक व वाहकाविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदा किसन कन्नौर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी जयश्री ही कंक्राळे गावातून बसने (क्र. एमएच १४, बीटी ४४९६) करंजगव्हाणला जात असताना अचानक आपत्कालीन दरवाजा उघडल्याने ती रस्त्यावर फेकली गेली. यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काका शिवाजी कन्नौर यांनी घटनास्थळी दाखल होत तिला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बसचालक प्रशांत हिरामण चव्हाण (रा. शेंदुर्णी) व वाहक नितीन साखरचंद शेवाळे (रा. सायने) यांच्याविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार एच. डी. चव्हाण हे करीत आहेत.

गाड्यांची दुरवस्था
या घटनेमुळे कंक्राळे गाव परिसरात शोककळा पसरली. जयश्रीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार अन् गाड्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. कंक्राळे परिसरात घडल्या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *