२६/११ च्या गोळीबारादरम्यान रतन टाटा ताज हॉटेलजवळ पोहोचले अन्…, मुलाखतीत सांगितलेला घटनाक्रम; मृतांच्या कुटुंबांना केलेली मोठी मदत

देशातील प्रसिद्ध उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ वर्या वर्षी निधन झालं आहे. बुधवारी (९ ऑक्टोबर) रात्री मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांनी उद्योगांबरोबरच सामाजिक क्षेत्रातही नेहमी योगदान दिलं आहे. रतन टाटा जितके साधे होते तितकेच कणखरही होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांनी टाटांच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलला देखील लक्ष्य केलं होतं. दहशतवाद्यांनी हॉटेल ताज महाल पॅलेसमध्ये घुसून तिथले कर्मचारी, मुंबईकर व पर्यटकांच्या हत्या केल्या होत्या. मुंबईतील विविध भागात दहशतवादी गोळीबार करत असतानाच रतन टाटा ताज हॉटेलमध्ये दाखल झाले होते. यावर रतन टाटा यांनी स्वतः एका मुलाखतीत भाष्य केलं होतं.

नॅशलन जिओग्राफी इंडियाशी बोलत असताना रतन टाटांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला होता. ते म्हणाले, “मी त्या रात्री आमच्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना फोन केला. मात्र कोणीही फोन उचलला नाही. मला थोडं आश्चर्य वाटलं. कारण यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं. त्यानंतर मी माझी कार घेऊन हॉटेलवर पोहोचलो. परंतु, वॉचमनने मला बाहेरच रोखलं. त्याने सांगितलं हॉटेलमध्ये गोळीबार चालू आहे”.

पीडितांना टाटांकडून मदत

या दहशतवादी हल्ल्यामुळे ताज महाल पॅलेस हॉटेलचं तब्बल ४०० कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन आठवड्यांत ताज पब्लिक सर्व्हिस वेल्फेअर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या ‘ताज’च्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ३६,८५ लाख रुपये सुपूर्द करण्यात आले. तसेच हे कर्मचारी निवृत्त होण्याच्या तारखेपर्यंतचा पगार त्यांच्या कुटुंबाला दिला जाईल, अशी व्यवस्था केली. दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळेल याची व्यवस्था देखील टाटांनी केली, अशी माहिती मनोरमा ऑनलाईनने प्रसिद्ध केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *