पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील नऊ विभागांत घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधवारी) जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल 91.26 टक्के लागला असून, कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजे 95.68 टक्के निकाल लागला आहे.
विद्यार्थ्यांना आज दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल बघता येणार आहे. बारावीचा निकाल www.mahresult.nic.in, www.maharashtraeducation.com, www.hscresult.mkcl.org, www.rediff.com/exams या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दुपारी एकपासून पाहायला मिळेल. त्याची प्रतही (प्रिंट) घेता येईल. राज्य शिक्षण मंडळाच्या (एचएससी बोर्ड) विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाच्या मूळ गुणपत्रिका चार जून रोजी दुपारी तीन वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात मिळतील.
एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची असल्यास, मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर विहित नमुन्यात 15 जूनपर्यंत अर्ज करता येईल. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे आवश्यक आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत दिली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकालानंतर 15 जूनपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.
विभागवार निकाल –
कोकण 95.68 टक्के
अमरावती 92.50 टक्के
कोल्हापूर 92.13 टक्के
नागपूर 92.11 टक्के
लातूर 91.97 टक्के
औरंगाबाद 91.77 टक्के
मुंबई 90.11 टक्के
नाशिक 88.13 टक्के
पुणे 91.96 टक्के