बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्या कारखान्याला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर अमरावती महापालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. अगिनशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर ताबा मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे आकाशात मोठे धुराचे लोट पाहायला मिळत आहेत.
बडनेरा मार्गावरील जुन्या एमआयडीसीत राम इंडस्ट्रिज या कंपनीचा खाद्यतेल कारखाना आहे. या ठिकाणी शेंगदाणा आणि इतर तेलबियांचे गाळप गेले जाते. या कारखान्याला सकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागली. या कारखान्यात ज्वलनशील तेलाचा मोठा साठा असल्याने आगीने लगेच रौद्र रुप धारण केले. अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या कारखान्यात खाद्यतेलाचा साठा असल्याने आग पसररण्याचा धोका निर्माण झाला. सुरूवातीला एमआयडीसी परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आणि त्यानंतर उच्च दाबाच्या बंबांमधून पाणी फवारण्यात आले. सकाळची वेळ असल्याने कारखान्यात कर्मचारी पोहचलेले नव्हते. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेतला जात आहे. पोलीस, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत या घटनेत सुदैवाने जीवितहानीचे वृत्त नाही. ही आग लगतच्या भागात पसरू नये, याची दक्षता घेतली जात आहे. या आगीचा धूर दूरपर्यंत पोहचला होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या अडचणी वाढल्या.
याच एमआयडीसी परिसरात दोन वर्षांपुर्वी आनंद सागर कॉटन इंडस्ट्रीजमध्ये आग लागली होती. या आगीत सुमारे २९ लाख रुपयांचा कापूस जळून नुकसान झाले होते. त्याआधी २०२१ मध्ये नॅशनल पेस्टिसाईड्स अॅन्ड केमिकल या कारखान्याला भीषण आग लागून यंत्रसामग्री, खते आणि रसायनांचा साठा जळून खाक झाला होता. ही भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल २१ तास प्रयत्न करावे लागले होते. महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब कमी पडल्याने चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अचलपूर, बडनेरा येथून अग्निशमन वाहने मागविण्यात आली होती. ६० पाण्याचे आणि ३५ रासायनिक फोमचे बंब वापरून २१ तासांनंतर ही आग आटोक्यात आली होती. राम इंडस्ट्रिजला बुधवारी लागलेल्या आगीने या घटनांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.