शिंदे सरकार अदानींच्या खिशात; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका

धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत. धारावीचा पुनर्विकास व्हावा, अदानींचा नाही. मात्र, शिंदे सरकार अदानींच्या खिशात आणि मुंबई अदानीच्या घशात अशी स्थिती सध्या असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी धारावी येथे केली.

धारावीसाठी धारावी बचाव आंदोलन करताना आता संपूर्ण मुंबईसाठी मुंबई रक्षक आंदोलन करण्याची गरज ठाकरे यांनी व्यक्त केली. देशात इंग्रज व्यापार करण्यासाठी आले आणि राज्यकर्ते बनले. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील जमिनी अदानींच्या घशात घालण्याचा डाव आहे. शिंदे सरकार हे अदानींचे नोकर आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर पाचशे चौरस फुटांचे घर सर्व धारावीकरांना पात्र ठरवून दिले जाईल, असे ठाकरे यांनी नमूद केले.

जाती, धर्म व प्रांतांमध्ये भांडणे लावून भाजप सरकारला सत्ता मिळवायची असते. अयोध्येतील जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्या गेल्या. हिंदू मंदिरांच्या जमिनी हे सरकार विकासकांच्या घशात घालत आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी अदानींच्या घशात घालायचा आहेत. हिंदू मंदिरे आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी विकून दिल्या जाणार नाहीत. धारावीकरांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना ठाकरे गट लढण्यासाठी उभा आहे. धारावीवर बुलडोझर फिरविला जाण्याची शक्यता आहे. पण हा बुलडोझर त्यांच्यावरच उलटविण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *