‘कावळ्यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला, टोचून टोचून रक्तबंबाळ केलं’

अनिल देशमुख  आणि सचिन वाझे प्रकरणावरून संजय राऊतांनी आज देवेंद्र फडणवीसांना  प्रत्युत्तर दिलंय. कावळ्यानं टोचून-टोचून फडणवीसांना रक्तबंबाळ केलंय. रेटून खोटं बोलल्यामुळे कावळ्यांनी त्यांच्यावर हल्ले केलेत, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. दरम्यान, परमबीर सिंह आणि फडणवीसांमध्ये डील झाली होती. या आरोपांना उत्तर देतान फडणवीसांनी ‘झूठ बोले कौवा काटे… काले कौवे से डरियो’, असं उत्तर दिलं होतं… याला आज राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंह  यांनी माझ्यावर आरोप लावले असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. याबद्दल विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस यांनी ‘झूठ बोले कौवा काटे… काले कौवे से डरियो’ असा चिमटा काढला.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाबद्दल विचारलं असता त्यांनी कावळ्यानं टोचून-टोचून फडणवीसांना रक्तबंबाळ केलं आहे असा टोला लगावला. ते म्हणाले की, “त्यांचं शरीर पाहिलं का? कावळ्यांनी टोचून टोचून रक्तबंबाळ केलं आहे. त्यांनी मलमपट्टी केली आहे. रेटून खोटं बोलल्याबद्दल कावळ्यांनी त्यांच्यावर किती वेळा हल्ले केले आहेत”.

अनिल देशमुखांनी काय आरोप केला आहे?

“मी गृहमंत्री असताना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर गाडी मालक मनसुख हिरेनची हत्या झाली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंह जे तेव्हाचे मुंबई पोलिसांचे आयुक्त होते, तेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड होते. त्यांना एनआयएमार्फत अटक होणार होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात बोलणं झालं आणि तेव्हा परमबीर सिंह फडणवीस यांना शरण गेले. तेव्हा फडणवीसांनी परमबीर सिंह यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावलं. परिणामी, फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप लावले.” असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *