मुंबईत घराचं स्वप्न, मित्रानेच मित्राला संपवलं; कसारा घाटात मृतदेह फेकला आणि…

मुंबईत घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अकाउंटंट मित्राला दारुची पार्टी देण्याच्या बहाण्याने आरोपी मित्राने दोन साथीदारांच्या मदतीने कारमध्येच त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह कसारा घाटातील मुंबई नाशिक महामार्गावरील कामडी पाड्याच्या हद्दीत असलेल्या पुलाखाली नग्न अवस्थेत फेकून दिला होता. मात्र ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने कट रचून केलेल्या हत्येचा कसोशीने तपास करून आरोपी मित्रासह त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. चंद्रसेन पवार (वय ३३), या मित्रासह नूर मोहम्मद चौधरी (वय २१) आणि हृतिक पांडे (वय २२) असं अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावं आहेत. तर विजय जाधव (वय ३५. रा. घाटकोपर मुबंई) असं हत्या झालेल्या मित्राचं नाव आहे.

मुंबई या माया नगरीत स्वतःचं घर असावं असं मुबंईत राहणाऱ्या बहुतांश नागरिकांचं स्वप्न असतं आणि हेच घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत आणि जिद्दीने कष्ट करून अनेकांनी मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न साकारही केलं. मात्र मुख्य आरोपी चंद्रसेन याचा मृत मित्राच्या घाटकोपर येथील फ्लॅटवरच डोळा होता. मृत विजय हा एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत होता. त्यांचा घाटकोपर येथे एक फ्लॅट होता. तर आरोपी चंद्रसेन हा भाड्याच्या घरात राहत होता. दोघांची चांगलीच मैत्री असल्याने दोघंही नेहमी पार्टी करताना अनेकदा आरोपीन मृत मित्राकडे मुंबईत घर घेण्यासाठी उत्सुकता दाखवत होता.

कसारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जाधव आणि आरोपी पवार यांच्यात नुकतेच वादही झाल्याचे तपासात समोर आलं. विशेष म्हणजे आरोपी पवार हा मृत जाधववर त्याचा घाटकोपर येथील फ्लॅट कमी किमतीत विकण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र मृत जाधव यांनी नकार दिला. तर दुसरीकडे मृत जाधव हे आपल्या पत्नीला घटस्फोट देणार आहेत. त्यामुळे पोटगीमुळे घर गमवावं लागू शकतं, हेही आरोपी पवारला समजलं होतं.

त्यानंतर त्यांच्यात नुकत्याच झालेल्या वादानंतर आरोपी पवारने नूर मोहम्मद चौधरी आणि हृतिक पांडे या दोन साथीदारांसह जाधव यांच्या हत्येचा कट रचला. ठरल्याप्रमाणे २९ जुलै रोजी रात्री तिन्ही आरोपींनी मृत जाधव यांना पार्टीचं आमिष दाखवून त्यांना दारूच्या नशेत असताना नंतर कारमध्ये त्यांचा गळा आवळून हत्या केला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कसारा घाटात त्यांचा मृतदेह मुंबई नाशिक महामार्गावरील कामडी पाड्याच्या हद्दीत असलेल्या पुलाखाली नग्न अवस्थेत फेकून दिला आणि पुन्हा मुंबईकडे रवाना झाले होते.

दरम्यान, ३० जुलै रोजी अनोखळी पुरुषाचा मृतदेह आढल्याची माहिती कसरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत अज्ञात मारेकऱ्यां विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) २३८ प्रमाणे गुन्हा करत आरोपींचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मृतदेहाची ओळख पटवून त्या दिशेने तपास करत किचकट गुन्ह्याची उकल करण्यासाठी घटनास्थळ परिरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पथकाला आव्हानात्मक होतं. त्यामुळे गुन्ह्यात सहभागी असलेल्या विशिष्ट कारची ओळख पटवणं कठीण झालं होतं.

त्यानतंर मुबंई नाशिक महामार्गावर घटनेच्या दिवशी वाहनांची तसंच कारचे विस्तृत तांत्रिक पुरावे तपासल्यानंतर, पथकाने आरोपींना शोधण्यात यश मिळाल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी दिली आहे. तसंच तिन्ही आरोपींना गुन्हा दाखल झाल्यापासून ३६ तासांतच मुंबईतील विविध भागातून अटक करत २ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केलं असून आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *