मुंबई महानगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे सकाळच्या वेळी कार्यालयांमध्ये निघालेल्या नोकरदारांना फटका बसला लागले. तसेच कोसळणारा मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे रेल्वे रुळावर काही प्रमाणात पाणी भरले होते. मात्र रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली न गेल्याने लोकल सेवा सुरू होती.
मुंबईत शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहर भागासह उपनगरात पावसाच जोर वाढल्याने त्याचा रेल्वे सेवेला फटका बसला. लोकल मध्य रेल्वे मार्गावर २० ते ३० मिनिटे, हार्बर मार्गावर १० ते २० मिनिटे आणि पश्चिम रेल्वेवर १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास उशीर होत आहे. पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे सेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
