मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर ते अगदी कोकण पट्ट्यामध्ये पावसानं मागील 48 तासांपासून जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. पुढील 24 तासांमध्ये या परिस्थितीमध्ये फारसा फरक दिसून येणार नाही. कारण, हवामान विभागाच्या वतीनं राज्याच्या कोकण, पश्चिम किनारपट्टी क्षेत्रासह विदर्भाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
हवमानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार सध्या उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची प्रणाली असून, ही प्रणाली अंतर्गत भागांच्या दिशेनं सरकताना दिसणार आहे. परिणामी ते 21 जुलै दरम्यानच्या काळात कोकण, पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात्या अंतर्गत भागांमध्ये पावसाची हजेरी असतानाच उर्वरित देशातही चित्र काहीसं असंच दिसणार आहे. सध्या मध्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दिवसा दाटून येणार पावसाचे काळे ढग
मुंबई शहर आणि उपरनगरांसह राज्याच्या घाटमाथ्यावरील परिसरामध्ये भर दिवसा काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळणार आहे. सातारा, कोल्हापूरासह कोकण आणि पुण्यातील घाटमाथ्यावर दृश्यमानतेवर याचे परिणाम होताना दिसून येतील. दरम्यान, या घाट क्षेत्रामध्ये मध्यम ते मुसळधार आणि काही ठिकाणांवर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तिथं विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, इथं विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30 ते 40 किमी वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शुक्रवारपासूनच कोकणात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारची सकाळ मुंबई आणि ठाण्यासाठी मुसळधार पावसानं झाली असून असाच पाऊस सुरू राहिल्यास शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
