वसईवरुन ठाण्याला लोकलने जायचं म्हणजे खूप वेळ खर्ची होतो. तर, रस्तेमार्गे जायचे तर फाउंटन हॉटेल येथील वाहतूक कोंडीत अडकून बसावे लागते. मात्र, याच वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी वसई-ठाणे भुयारी प्रवास प्रकल्प आखण्यात येणार आहे. भुयारी मार्ग, उन्नत रस्त्याच्या २० हजार कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं ठाण्यातील वाहतूक कोंडीदेखील कमी होणार आहे.
ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि ठाणे वसई, विरार, मीरा, भाईंदर प्रवास वेगवान करण्यासाठी आता ‘एमएमआरडीए’ ने वसई, फाऊंटन हॉटेल नाका ते गायमुख, ठाणे असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तर फाऊंटन हॉटेल ते भाईंदर असा उन्नत रस्ताही बांधण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या प्रस्तावास मंगळवारी एमएमआरडीएच्या प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हे दोन्ही प्रकल्पांसाठी अंदाजे २० हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे.
प्रकल्पामुळं काय फायदा होणार?
घोडबंदर येथे वाहतूक कोंडीमुळं ठाणेकर हैराण झाले आहेत. तासनतास या ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागते. पण घोडबंदर ते वसई वा घोडबंदर ते भाईंदर असा रस्ता बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाणे खाडी आणि डोंगराळ भाग असल्याने रस्ता बांधणे अशक्य आहे. त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल नाका असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे ते बोरिवली प्रवास सूकर करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने ठाणे बोरिवलीदरम्यान ११.८ किमीचा दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. त्यातच आता ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड आणि भाईंदरला जाणे सोपे व्हावे यासाठी फाऊंटन हॉटेल नाका, वसई ते गायमुख, घोडबंदर, ठाणे असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गायमुख ते वसई बोगद्याने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला अतिवेगाने जाता यावे यासाठी फाऊंटन हॉटेल, वसई ते भाईंदर असा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
कसा असेल रस्ता?
फाऊंटन हॉटेल नाका, वसई ते गायमुख बोगदा ५.५ किमीच असेल तर फाऊंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत रस्ता १० किमीचा असणार आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी अंदा २० हजार कोटी खर्च अपेक्षि आहे. हा बोगदा चार मार्गिके असणार असून उन्नत रस्ता 6 मार्गिकेचा असणार आहे.
