सत्संगला जाऊ नको असं पत्नीला सांगितलं पण…; हाथरसमधील पीडितांचा प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा

मी तिला अनेकदा संत्संगला जाण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या पत्नीने ऐकलं नाही. जर तिने माझं ऐकलं असतं तर…” पत्नीबद्दल बोलताना मेहताब यांचा कंठ दाटून आला होता. पाणावलेल्या डोळ्यांनी मेहताब त्यांच्या पत्नी गुड़िया देवीबद्दल सांगत होते. हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत गुड़िया देवी मृत पावल्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या 2 महिलांचा देखील मृत्यू झाला आहे. संत्संगमध्ये जाऊ नकोस असं मेहताब यांनी अनेकदा गुड़िया देवी यांना सांगितलं होतं. पतीची गोष्ट ऐकली असती तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण देश हादरलाय. या सत्संगमध्ये बाबाच्या दरबारात मृतदेहांचा ढीग पडल्याचं चित्र पहायला मिळाल. काही वेळातच संपूर्ण संकुल स्मशानभूमी बनली होती. या घटनेत दुर्घटनेत आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे. या सत्संगाचे आयोजन नारायण साकार हरी नावाचा बाबा करत होता. बाबाचे आशीर्वाद घेण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक आले होते.

हाथरस दुर्घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी जे सांगितले ती कहाणी काळीज पिळवटून टाकणारी आहे. या अपघातात कोणाचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय, तर काहींच्या कुटुंबातील लोकांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. मंगळवारची परिस्थिती अशी होती की, लोक मृतदेहांमध्ये पडलेल्या लोकांचे श्वास तपासत होते, अजूनही श्वास घेत आहेत का आणि त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांचे प्राण वाचवता येतील का, असं चित्र पाहायला मिळालं.

‘मी सर्वकाही गमावलं’

हाथरसच्या चेंगराचेंगरीमध्ये पत्नी, आई आणि 16 वर्षांची मुलगी गमावलेले विनोद मोठ्या धक्क्यात आहेत. विनोद म्हणाले की, मी या अपघातात स्रव काही गमावलं आहे. या तिघीही सत्संगाला गेल्याचं मला माहीती नव्हते. सत्संगात चेंगराचेंगरी झाल्याचे समजताच मी घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी मला समजलं की, या चेंगराचेंगरीत मुलगी, आई आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अजूनही माझ्या आईचा मृतदेहही सापडला नाही.

मुलगी रोशनीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना, हाथरस घटनेतील 16 वर्षीय मुलीच्या पीडितेच्या आई कमला म्हणाल्या, ‘मी 20 वर्षांपासून बाबांच्या सत्संगाला येतेय. यावेळी मी आपल्या 16 वर्षांच्या मुलीसोबत आले होते. दुपारी दोनच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. मला आणि माझ्या मुलीला किरकोळ दुखापत झाली. आम्ही ठीक होतो पण रुग्णालयात पोहोचताच माझी मुलगी बेशुद्ध पडली आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

याच अपघातात मृत्यु झालेल्या गुडिया देवी यांचे पती मेहताब म्हणाला, ‘मी तिला बाबांच्या सत्संगाला जाण्यापासून अनेक वेळा थांबवलं पण ती ऐकली नाही. पत्नी, माझी मुलगी आणि शेजारच्या दोन महिलांसोबत ती सत्संगासाठी आली होती. या घटनेत शेजारच्या महिला आणि माझी पत्नी या दोघींचा मृत्यू झाला. माझी मुलगी सुरक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *