श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत आज ढकला ढकलीचा प्रसंग घडला. सुदैवाने अनर्थ झाला नसला तरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे दर्शन रांगेतील त्रुटी आणि गलथान व्यवस्थापनाचा फटका भाविकांना बसला आहे. विशेष म्हणजे आषाढी यात्रेच्या नियोजनाची तयारी गेली दोन महिने प्रशासन करीत आहे. असे असताना आज गोंधळ उडाला. दर्शन रांगेत एकदम मोठ्या संख्यने भाविक दर्शनासाठी आले. त्यामुळे गोंधळ उडाला त्यात या ठिकाणचे रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही असे सांगत मंदिर समितीने याचे खापर पालिकेवर फोडले. मात्र, तुमचे सर्व नियम पाळू पण दर्शन आम्हाला व्यवस्थित होऊ दे , दर्शन रांगेतील घुसखोरी थांबा अशी मागणी भाविकांनी केली आहे.
आषाढी एकादशीचा सोहळा १७ जुलैला आहे. प्रमुख संतांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान ठेवल्या आहेत. तर मानाच्या पालख्या एक दोन दिवसात प्रस्थान ठेवतील. यंदा प्रशासनाने आषाढी वारी संदर्भात दोन महिन्या पासून नियोजन सुरु केले. स्थानिक पातळी वरून म्हणजे प्रांताधिकारी , जिल्हाधिकारी ते अप्पर सचिव अशा वरिष्ठ पातळी पर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या. यात कामाचे नियोजन ,काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख आदी सादरीकरण अतिशय प्रभावी पद्धतीने करून येथील विविध विभागातील अधिकार्यानी वरिष्ठांकडून कौतुक केले. त्याच बरोबरीने मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री विविध मंत्री , पालकमंत्री यांनी बैठका घेवून आढवा घेतल्या. काही सूचना केल्या. तसेच वारकरी ,महाराज मंडळींच्या देखील बैठका झाल्या. या सार्या बैठकी होत असल्याने यंदा वारीत चांगल्या सुविधा मिळतील अशी पंढरपूर नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या.
