पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी एनडीआरएफचे विशेष पथक रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये दाखल झाले आहे. पुढील अडीच महिने हे पथक महाड येथे मुक्कामास असणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच हे पथक महाडला पोहोचले आहे.
मागील वर्षी जुलै महिन्यात हे पथक दाखल झाले होते. यंदा मात्र महिनाभर आधीच एनडीआरएफ महाडमध्ये सज्ज आहे. अगदी सुरूवातीच्या दिवसात हे पथक रायगड जिल्हयातील दरडप्रवण तसेच पूरप्रवण क्षेत्राची पाहणी करेल. आगामी काळात कुठे आपत्तीजनक परीस्थिती निर्माण होवू शकते याचा अभ्यास केला जाईल आणि तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला जाईल असे दिलीपकुमार यांनी सांगितले. या पथकाकडे स्वयंचलित बोट, कटर, लाईफ जॅकेटस यासह बचावासाठी आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध आहे.
रायगड जिल्हयात विशेषतः महाड पोलादपूर तालुक्यात पावसाळयात घडणाऱ्या दुर्घटना लक्षात घेवून तेथे कायमस्वरूपी एनडीआरएफचा तळ असावा अशी मागणी समोर आली. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी त्याचा पाठपुरावा केला. या तळासाठी महाडमधील जागाही निश्चित झाली. परंतु अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. राज्य सरकारने एसडीआरएफचे पथक या ठिकाणी तैनात ठेवण्याचे मान्य केले होते परंतु त्याचेही घोडे अडलेले आहे.
