निवडणुका आणि कडक उन्हाळा यांमुळे मुंबई आणि परिसरातील पर्यटन स्थळांचा सुट्टीचा हंगाम काहिसा थंड झाला असला तरी आता मोसमी पावसाने पर्यटन व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. गेला आठवडाभर दिवसभरातून एकदातरी हजेरी लावणाऱ्या पावसाने परिसर हिरवागार झाला आहे, त्याचबरोबर पर्यटकांनीही परिसर फुलून गेला आहे. परिणामी, दर आठवडा अखेरीस हॉटेल आणि फार्म हाऊस १५ टक्के अधिक किंमतीने आगाऊ आरक्षित करण्यात आले आहेत. वाढते तापमान आणि लोकसभा निवडणूकीमुळे अलिबाग, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर, पालघर आणि वाडा आदी ठिकाणी पर्यटकांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत पर्यटकांच्या संख्येत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली होती. मात्र, मोसमी पाऊस स्थिरावताच आठवडा अखेरीस पर्यटकांची पावले जवळपासच्या पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. त्यामुळे बहुतेक ठिकाणी हॉटेल्स, फार्महाऊस, रिसॉर्ट्सच्या भाडे दरात १५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली.
पुणे आणि मुंबईच्यामधील लोणावळ्यात मुंबई आणि पुण्याव्यतिरिक्त गुजरात येथूनही मोठ्या संख्येने पर्यटक येतात. लोणावळ्यात शनिवार ते सोमवार पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे लोणावळ्यामधील हॉटेल, रिसॉर्ट आणि शेतघरे आगाऊ आरक्षित करण्यात आले आहेत. मे महिन्यातील पर्यटकांच्या कमी प्रतिसादानंतर जून महिन्यात पर्यटकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी राहील असे ‘सनराईस रिसॉर्ट’चे इस्माईल यांनी सांगितले.
