मुंबईत चक्रीवादळ येणार असल्याच्या बातम्या समाज माध्यमांतून पसरवल्या जात होत्या. 23 मे ते 27 मे दरम्यान मुंबईत सायक्लॉन वादळ येऊ शकते असे वृत्त पसरले होते. दरम्यान हवामान विभागाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
चक्रीवादळाचा मुंबई ला धोका नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे रुपांतर शनिवारी चक्रीवादळात, तर रविवारी महाचक्रीवादळात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईत या चक्रीवादळाचा परिणाम होणार असल्याची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. मात्र, मुंबईत या चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
चक्रीवादळाचा तडाखा मुंबई शहराला बसणार असल्याच्या अफवा व्हॉट्स ॲप, एक्सच्या माध्यमातून पसरविण्यात येत आहेत. या प्रकारचे मेसेज फॉरवर्ड केले जात होते. अशा वृत्तांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याचा कोणताही परिणाम मुंबई, तसेच राज्यात पहायला मिळणार नाही. याबाबत कोणताही इशारा जारी केलेला नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच सोशल मीडिया हॅंडलवर हवामानासंदर्भात वेळोवेळी अपडेट देण्यात येते. त्यामुळे इतर वृत्तांवर विश्वास ठेवून फॉरवर्ड करण्याआधी हवामान विभागाच्या वेबसाइटला भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान हवामान विभागाने मुंबईतील हवामानासंदर्भात अपडेट दिली आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.सकाळच्या वेळी आकाश अशंतः ढगाळ आणि दुपार / संध्याकाळ पर्यंत मुख्यतः निरभ्र राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 29°C च्या आसपास असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
