परभणीसह राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली. भल्या पहाटेच मतदान केंद्रांबाहेर मतदारांनी गर्दी केल्याचं चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळालं. मात्र परभणी तालुक्यातील बलसा खुर्द या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर पूर्ण बहिष्कार टाकला आहे. सकाळचे अकरा वाजून गेल्यानंतरही एकाही ग्रामस्थाने एकही मतदान केलं नव्हते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी गावात धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या परभणी तालुक्यातील बलसा खुर्द या गावातील मतदान केंद्रावर जवळपास १२९५ मतदार आहेत. ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला गावातील समस्यांविषयी अवगत केले होते. या समस्या जर सोडवल्या नाहीत, तर मतदानावर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा देखील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता. बलसा खुर्द हे पुनर्वसन झालेल्यांचं गाव आहे. इथल्या आपल्या काही अडचणी सोडवाव्यात, अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखलही घेतली होती, पण कारवाई केली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराज होऊन आज मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बलसा खुर्द गावात धाव घेत, बहिष्कार मागे घेण्याचं आवाहन केलं. तुमच्या मागण्यांचा विचार करु, आचारसंहिता संपल्यावर, निवडणुका झाल्या की त्यावर मार्ग काढू, पण ग्रामस्थांनी शंभर टक्के मतदान करावं, असं नम्र आवाहन करत असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.
त्यावर तुम्ही लेखी द्या, पत्राचे वाचन करुन निर्णय घेऊ आणि तुमच्या शब्दाचा मान ठेवत संपूर्ण मतदान करु, उत्तर ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी दिलं. मतदानाला सुरुवात होऊन पाच तास उलटल्यानंतरही एकही मतदान न झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती.
