1993 स्फोटाप्रकरणी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असेलल्या संजय दत्तची शिक्षा माफ करावी यासाठी केलेली याचिका राज्यपालांनी आज (गुरूवारी) फेटाळून लावली आहे. अडीच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्यायाधीश मार्केंडेय काटजूंनी राज्यापल सी. विद्यासागर राव यांच्याकडे शिक्षा माफीचा अर्ज केला होता.
संजय दत्त सध्या 30 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे. मुलीच्या ऑपरेशनसाठी संजय दत्तनं जूनमध्ये पॅरोलसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात जावं लागणार आहे. त्याच्या सुटकेसाठी अवघं काही महिने राहिले असताना त्यानं आपल्या चांगल्या वर्तणुकीवरून शिक्षेपासून सुटका मिळण्यासाठी दया याचिका केली होती. मात्र, आज राज्यपालांनी ती याचिका फेटाळल्याने त्याला पूर्ण शिक्षा भोगावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
1993 च्या बॉम्बस्फोटावेळी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजयला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, खटल्याच्या निकालापूर्वीच त्यानं दीड वर्षांचा कारावास भोगला होता. त्यामुळे सध्या तो 3 वर्षांची शिक्षा भोगत असून गेल्या 24 महिन्यांपासून तो पुण्याच्या येरवडा कारागृहात आहे. यापैकी 146 दिवस संजय दत्तनं जेलबाहेरच काढले आहेत.

