मुंबईत उपनगरीय लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणात दोषी ठरलेल्या बारा आरोपींपैकी आठ दोषींना सरकारी पक्षाने फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे.
कमल अन्सारी, तनवीर अन्सारी, फैसल शेख, एतशाम सिद्दीकी, महम्मद अली शेख, साजिद अन्सारी, नावीद खान आणि असीफ बाशीर यांना मृत्यूदंड सुनावण्याची सरकारी वकिलांनी मागणी केली आहे.
माजीद महम्मद शफी, मुझम्मील शेख, सुहैल शेख आणि जमीर शेख यांना आजीवन कारावास ठोठावण्याची मागणी केली आहे. विशेष मोक्का न्यायालय ३० सप्टेंबरला या दोषींना शिक्षा सुनावणार आहे.
दोषी ठरलेले गुन्हेगार भविष्यात सुधारण्याची अजिबात शक्यता नाही. आपण केलेल्या कृत्याबद्दल त्यांच्या मनात कुठलीही पश्चातापाची भावना नाही असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला.
सर्व दोषी हे मृत्यूचे व्यापारी आहेत. समाजात अशांतता, असुरक्षितता निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता असा युक्तीवाद विशेष सरकारी वकिल राजा ठाकरे यांनी केला.
शिक्षा सुनावताना दोषी ठरलेल्या गुन्हेगारांचे आरोग्य, सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी, शिक्षण आणि कौटुंबिक परिस्थिती विचारात घेऊ नये असे ठाकरे म्हणाले. या बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने तेरा जणांना आरोपी बनवले होते. त्यातील एकाची निर्दोष सुटका झाली.

