माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचे निधन

माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या जेष्ठ नेत्या मिनाक्षी पाटील यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवार पेझारी येथे दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिनाक्षी पाटील यांना त्यांचे वडील प्रभाकर पाटील यांच्याकडून राजकारणाचा वारसा लाभला होता. शालेय जीवनापासूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरविण्यास सुरवात केली होती. राजकारणात येण्याआधी त्यांनी पत्रकारितेतही काही काळ काम केले. वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांचे वक्तृत्व समृद्ध झाले होते.

अलिबाग मतदारसंघातून १९९५, १९९९, २००९ अशा तीन वेळा त्या विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी बंदरे आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे राज्यमंत्रीपद काही काळ सांभाळले होते. आपली अभ्यासपूर्ण भाषणे, ओघवती वक्तृत्वशैली यांमुळे त्या उत्तम वक्त्या म्हणून ओळखल्या जात. सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आणि माजी आमदार सुभाष पाटील यांच्या त्या जेष्ठ भगिनी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा आस्वाद पाटील, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल रायगड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *