‘डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या शासकीय संस्थेचे प्रसिद्ध वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. बिलाल यांनी केलेल्या पाहणीत दोडामार्ग तालुक्यातील मांगेली ते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य भागांत २२ पट्टेरी वाघांचा वावर आढळून आला. इतक्या मोठया संख्येने वाघ असणे ही साधी गोष्ट नाही,’ असे स्टॅलिन यांनी सांगितले. मांगेली ते आंबोली या भागात वाघांचे अस्तित्वच नसल्याचे वन विभागाचे अधिकारी आजवर सांगत आले आहेत. मात्र, आता वाघानेच आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. दोडामार्ग तालुक्यामध्ये सरसकट वृक्षतोड बंदी असताना वनविभागाच्या राखीव वनासह सुमारे तेराशे एकर क्षेत्रावरील जंगलात वृक्षतोड झाली आहे. याला वनविभाग आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधातही न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले.
पट्टेरी वाघांचे या परिसरातील अस्तित्व पाहता येथे विदर्भाप्रमाणे उत्कृष्ट व्याघ्र प्रकल्प विकसित होऊ शकतो. पण येथील राज्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधी त्या दृष्टीने काही दीर्घकालीन नियोजन करत नाहीत. त्यामुळे पर्यटन जिल्हाह्ण म्हणून सिंधुदुर्ग बऱ्याच वर्षांपूर्वी जाहीर होऊनही तेथे पर्यटन फारसे विकसित झालेले नाही.
