बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मित्राचा खून, दोघांना अटक

बहिणीशी प्रेमसंबंध ठेवणार्‍या मित्राचाच मित्रांच्या मदतीने कोयता व चाकूने वार करून खून केल्याची घटना कुपवाडजवळ बामणोलीच्या दत्तनगर परिसरात मध्यरात्री घडली असून या प्रकरणी दोन संशयितांना पोलीसांनी सोमवारी पहाटे अटक केली. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कुपवाड नजीक बामणोली येथे असलेल्या दत्तनगर परिसरात रविवारी रात्री साडेदहा वाजणेच्या सुमारास ओम श्रीधर देसाई (वय १८, रा. दत्तनगर, मूळ गाव अलकूड ता. कवठेमहांकाळ) याच्यावर कोयता व चाकूने वार करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला होता. औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे कुपवाड यांनी त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ओंकार जावीर, सोहम पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील व एक अनोळखी अशा चौघांविरूध्द पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आज पहाटे दाखल करण्यात आला. या खूनातील मुख्य संशयित ओंकार जावीर व सोहम पाटील यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कवलापूर गावच्या हद्दीत झुडुपात लपलेल्या स्थितीत पकडले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्य दोन संशयित मात्र अद्याप पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत.

या गुन्ह्याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मृत देसाई आणि संशयित एकमेकांचे मित्र आहेत. मृत देसाई याचे जावीर याच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. यावरून जावीर हा त्याच्यावर चिडून होता. रविवारी रात्री साडेदहा वाजणेच्या सुमारास सर्व मित्र दत्तनगर परिसरात गप्पा मारत असताना जावीर याने अन्य मित्रांच्या मदतीने देसाई याच्यावर घातक हत्याराने वार केले. तो गंभीर जखमी झाल्यानंतर चौघांनीही घटनास्थळावरून पलायन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *