ठाणे जिल्ह्यात शाळा वाहतूक ठप्प होण्याची भिती; शाळांच्या बसगाड्यांमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा

‘हिट अँड रन प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतुद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी पुकारलेल्या संपामुळे निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शालेय वाहतूक ठप्प होण्याची भिती व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांत नऊमाही परिक्षांना सुरुवात होणार असून याच काळात शाळा वाहतूक इंधन अभावी ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांची घर ते शाळा अशी बसगाड्यांमधून वाहतूक होते. काही शाळा स्वत: बसगाड्याचे संचलन करतात. तर, काही शाळांमध्ये खासगी बसगाड्यांमार्फत विद्यार्थ्यांची वाहतूक होते. ठाणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी तीन हजाराहून अधिक वाहने आहेत. तर, ठाणे शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी सातशे ते आठशे वाहने आहेत. यामध्ये छोट्या आणि मोठ्या बसगाड्या, मोटार आणि रिक्षांचा समावेश आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळांनी विद्यार्थ्यांना ख्रिसमसची सुट्टी दिली होती. १ जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. पण, इंधन तुटवड्यामुळे शाळा बसवाहतूकदार चिंताक्रांत झाले आहेत.

‘हिट अँड रन प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतुद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी संप पुकारला आहे. या संपामुळे इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी इंधन संपले आहे तर, काही ठिकाणी इंधनाचा पुरेसा साठा शिल्लक नाही. शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच इंधन साठा आहे. हा संप असाच पुढे सुरू राहीला तर, शालेय वाहतूक ठप्प होईल, अशी भिती शालेय वाहतूकदारांनी व्यक्त केली आहे.

माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाला आमचा पाठींबा आहे. पण, आम्ही अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे संपात सामील होऊ शकलो नाही. तसेच वाहनांंमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल इतका इंधनसाठा शिल्लक आहे. इंधन मिळाले नाहीतर शालेय वाहतूक ठप्प होईल.

वाहनांमध्ये जितके इंधन आहे, तितेकच दिवस ते चालू शकेल. शाळा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल इतकेच इंधन असते. ते संपले तर शाळा वाहतूक बंद होईल. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होईल. तसेच कोणताही चालक जाणूनबूजून अपघात करत नाही, कारण अशा अपघातात त्याचाही जीव जाऊ शकतो. अपघातांची इतरही कारणे आहेत. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालून मार्ग काढायला हवा.

संपामुळे इंधन तुटवडा निर्माण झाला असून त्याचा परिणाम शाळा बस वाहतूकीवर होण्याची शक्यता आहे. तसेच इंधन मिळाले नाहीतर शिक्षकांनाही स्वत:च्या वाहनाने शाळेत येणे शक्य होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *