मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी ११ बॉम्ब ठेवले असून मागण्या मंजूर न झाल्यास त्यातील तीन ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ईमेल रिझर्व बँकेला प्राप्त झाला. ईमेलमध्ये फोर्टमधील आरबीआय नवीन केंद्रीय कार्यालय इमारत, चर्चगेट येथील एचडीएफसी हाऊस आणि वांद्रे-कुर्ला संकूल येथील आयसीआयसीआय बँक टॉवर्स येथे तीन बाॅम्बचा बरोबर दीड वाजता स्फोट होईल, असे धमकावण्यात आले होते. या धमकीच्या ईमेलमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ईमेलनंतर संबंधीत ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत (आरबीआय) खाजगी क्षेत्रातील बँकांनी मिळून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. त्यात अनेक मोठे व्यक्ती व अधिकारी सामील आहेत. आरबीआय गव्हर्नर आणि वित्त मंत्री या दोघांनाही मागणी करतो की, त्यांनी त्यांच्या पदांचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि एक परिपत्रक जारी करत घोटाळ्याच्या संपूर्ण खुलासा करावा. त्या दोघांना आणि या घोटाळ्याशी अन्य संबंधितांना शिक्षा द्यावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करतो. जर आमची मागणी दुपारी दिड वाजण्याच्या आधी पूर्ण झाली नाही तर, सर्व ११ बॉम्ब एकाने फोडले जातील, अशी धमकी देणारा ईमेल मंगळवारी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी आरबीआयच्या मुंबईतील कार्यालयातील अधिकृत ईमेल आयडीवर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
