थंडीच्या मोसमामुळे सुक्या मासळीची आवक घटल्याने व मागणीत वाढ झाल्याने दरवाढ झाली आहे. यामध्ये सर्वसामान्यांचं अन्न असलेले बोंबील आणि करंदीचे दर गगनाला भिडले आहेत. हे दर किलोला ६०० रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र तरीही किनारपट्टीवरील रहिवासी खिशाला चाट देत सुकी मासळी खरेदी करीत आहेत.
सागरी किनारपट्टीवर खोल समुद्रातील, खाडीतील ताजी आणि यातीलच निवडक सुकविलेली मासळी मिळते. यातील सुकी मासळी ही पावसाळ्यात मासळीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सुकविलेल्या मासळीचा वापर केला जातो. परंतु समुद्रातील मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शिल्लक आणि लहान आकाराची मासळी सुकविली जाते. त्याचेही प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे ही मासळी सुकविण्यासाठी लागणारी जागा ही उपलब्ध नसल्याने मच्छीमारांना मासळी सुकविणे कठीण झाले आहे. परिणामी सुक्या मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. या वाढत्या अडचणीमुळे सुक्या मासळीचाही दुष्काळ निर्माण झाला आहे.
