40 मिनिटांचा प्रवास फक्त 4 मिनिटात! विठ्ठलवाडीतून कल्याण नगर महामार्गावर जाण्यासाठी नवा मार्ग

कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी 700 कोटी रुपयांचा उन्नत मार्गाचा प्रकल्प मंजूर करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विठ्ठलवाडीतून  कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी आता थेट उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रवासासाठी कल्याण किंवा उल्हासनगर शहराचा मोठा वळसा घालून जावे लागते. या प्रवासासाठी तब्बल 40 मिनिटे लागत होती. पण आता जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी चार मिनिटे लागणार आहेत. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनापुढे या मार्ग काढण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार आता लवकरच या कामासाठी निविदा जाहीर केली जाणार आहे.

शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भाची माहिती दिली. विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी कल्याण आणि उल्हासनगर शहराला मोठा वळसा घालून जावे लागते. मात्र आता जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी उन्नत मार्गाची उभारणी केली जाणार आहे. एमएमआरडीएकडून सर्व्हे करून 70 टक्के जागा संपादित करण्यात आली आहे. तसेच या उन्नत मार्गासाठी 700 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या उन्नत मार्गामुळे 40 मिनिटांचा प्रवास हा 4 मिनिटांचा होणार आहे. त्यामुळे शहरात जाणारी वाहतूक परस्पर वळवली जाणार आहे. कल्याण,डोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ,बदलापुर या शहराना याचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय लवकरच या कामाची निविदा जाहीर केली जाणार असून आहे. येत्या दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली.

“काही नवीन प्रकल्प आपण या ठिकाणी आणत आहोत. हा प्रकल्प कल्याण आणि उल्हासनगर शहरांना जोडणारा आहे. कल्याण विठ्ठलवाडी डेपो येथून हा मार्ग सुरु होऊन वालधुनीच्या मार्गे हा प्रकल्प शहाडपर्यंत जाईल. यामाध्यमातून शहाडपासून विठ्ठलवाडीपर्यंत येण्यासाठी 40 मिनिटे लागतात. पण आता अडीच किमीच्या या रस्त्यासाठी लोकांना फक्त चार मिनिटे लागतील. हा सातशे कोटींचा प्रकल्प असून त्याची निविदा लवकर निघेल. पुढच्या दोन वर्षात लोकांचा वेळ वाचवणारा मार्ग तयार होणार आहे. त्याचबरोबर कल्याण मेट्रो 12 साठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. हा 5,500 कोटींचा प्रकल्प आहे. 20 किमीचा हा मार्ग कल्याणमधील लोकांना मिळणार आहे. पाच शहरांना मेट्रोद्वारे जोडले जाणार आहे,” अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *