यूएई येथे डिसेंबर महिन्यात भारत-पाक क्रिकेट मालिका आयोजित करण्यासाठी भारताकडे आग्रह करा; पण त्यांची मनधरणी करू नका, असा सल्ला पाक टी-२० संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने पाक बोर्डाला दिला आहे.
लाहोर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरादरम्यान पत्रकारांशी बोलताना शाहीद म्हणाला, ‘भारताची मनधरणी करण्याऐवजी पीसीबीने अन्य संघांना पाक दौरा करण्यासाठी आमंत्रण द्यावे. भारताविरुद्ध खेळण्यास अपेक्षेपेक्षा अधिक महत्त्व देण्यास अर्थ नाही,’ असे माझे स्पष्ट मत आहे.
मालिका आयोजनासाठी आम्ही नेहमी भारतापुढे लोटांगण का घालतो, हेच माझ्या समजण्यापलीकडचे असल्याचे आफ्रिदीने सांगितले. भारत आमच्याविरुद्ध खेळण्यास तयार नसेल, तर आम्ही तुमच्याविरुद्ध खेळण्यास आतूर आहोत, हे वारंवार सांगण्याची गरज नाही, या शब्दांत आफ्रिदीने बोर्डाला सुनावले. आमची जितकी गरज आहे तितकीच भारताचीही गरज असायला हवी, असे तो म्हणाला. भारत-पाक दरम्यान २००७ आणि २०१२-१३ या वर्षांत मर्यादित षटकांच्या मालिकेचा अपवाद वगळता द्विपक्षीय मालिका आयोजित झालेली नाही. उभय संघांदरम्यान २०१५ ते २०२३ या काळात सहा मालिकांचे आयोजन प्रस्तावित आहे.

