मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाचे काम पूर्ण, बेअरिंग दुरुस्ती झाल्याने कोंडीचे टेन्शन मिटले

मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाच्या बेअरिंग दुरुस्तीचे काम रविवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्यामुळे आता या पुलावरून अवजड वाहतूकही सुरु केली जाणार आहे. अवघ्या पाच दिवसात हे काम पूर्ण करण्यात आल्याने वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलाच्या कामामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत होत्या. मात्र आता या कोंडीचेही टेन्शन मिटले आहे.

साकेत खाडी पुलाचे बेअरिंग निसटल्याने पुलाच्या जोडणीच्या ठिकाणी हादरे बसत होते. २३ ऑगस्ट रोजी ही बाब समोर येताच पुलाच्या कामाला एमएसआरडीसीकडून सुरवात करण्यात आली. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागणार होता. मात्र दुरूस्तीचे काम सुरू झाल्यानंतर या मार्गावर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. अखेर या दुरुस्तीच्या कामासाठी अभियंत्यांची टीम आणि अतिरिक्त मनुष्यबळ वापरून हा पूल चार दिवसांतच खुला करण्यात एमएसआरडीसीला यश आले. त्यामुळे ठाणे वाहतूक शाखेने या पुलावरून जाणारी बंद केलेली अवजड वाहनांची वाहतूकही रविवारी रात्रीपासून पूर्ववत केली जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

…आणि मोहीम फत्ते झाली
बेअरिंग दुरुस्तीसाठी मुंबईहून नाशिककडे जाणारी या खाडी पुलावरील मार्गिका रात्री १२ ते सकाळी सहा या वेळेत सर्वच वाहनांसाठी बंद ठेवण्यात येत होती. या काळात पुलावरील भागाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे चार दिवसात ही मोहीम फत्ते झाली. आता पुलाखालील भागात काम केले जाणार असून याठिकाणी काम करण्यासाठी वाहतूक थांबवावी लागणार नसल्याने वाहनांचा मार्ग सुकर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *