गणेशोत्सवानिमित्त मुंबईकरांची दोन दिवस पाणीकपातीपासून सुटका होणार आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला मुंबईत पाणीकपात नसल्याने मुंबईकरांना सुटकेचा निश्वास टाकला आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर गणेशोत्सवातील मुख्य दोन दिवस मुंबईत पाणी कपात न करण्याचा निर्णय झाला.
मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला पाणीकपात न करण्याचे आदेश दिले असले तरी पाणी जपून वापरण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाच्यावेळी पाण्याचा अपव्यय टाळण्याचंही आवाहन गणेशभक्तांना करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा पोहचत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन करण्यात येत आहे. सध्या मुंबईत 20 टक्के पाणीकपात लागू आहे.

