अनैतिक संबंधातून रिसेप्शनिस्टची हत्या; बिल्डरच्या पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवलं

उत्तर प्रदेशमध्ये अनैतिक प्रेमसंबधातून  एका तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका महिलेने पतीच्या प्रेयसीचा भावांसह मिळून खून केला आहे. गाझियाबादमधील मुरादनगर येथे 3 ऑगस्ट रोजी हिंडन नदीच्या काठावर एका मुलीचा गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर आता या प्रकरणाचा छडा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

मृत तरुणीचे नाव रागिणी असल्याची माहिती समोर आली आहे. रागिणी उर्फ आरोही शाहची गाझियाबादमध्ये बांधकाम व्यावसायिकासोबत असलेल्या अनैतिक संबधावरून हत्या करण्यात आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे या खून प्रकरणाची मुख्य सूत्रधार ही बांधकाम व्यावसायिकाची पत्नीच होती. पत्नीनेच त्याच्या भावाला रागिणीची हत्या करायला सांगितली होती. पत्नीने तिच्या भावाला रागिणीचे घरातून अपहरण करायला सांगितले आणि नंतर तिचा खून करुन तिला पुलाखाली फेकून द्यायला सांगितले.

माझ्या बहिणीला त्रास देत होता म्हणून…

पोलिसांनी याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक बंटी सिंग, त्याची पत्नी राखी सिंग, मेहुणा अमित कुमार आणि त्याचे दोन मित्र करण उर्फ केपी आणि अंकुर सिंग यांना अटक केली आहे. आरोपींकडून एक पिस्तूल, 2 काडतुसे आणि खुनासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, ‘रागिणी बंटीसोबत प्रॉपर्टी डील करत होती. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. रागिणीला अनेक गोष्टींची आवड होती. याच कारणामुळे रागिणी पतीपासून वेगळी राहत होती. रागिणीमुळे बंटी माझ्या बहिणीला त्रास देत होता. त्यामुळेच रागिणीला मार्गातून दूर करण्याची आमची योजना होती,’ असे आरोपीने सांगितले.

गाझियाबादमध्ये 3 ऑगस्ट रोजी हिंडन नदीच्या पुलाखाली रागिणीचा मृतदेह सापडला होता. दोन दिवसांनी तिची ओळख पटली होती. नोएडाची रहिवासी असलेली रागिणी आदित्य वर्ल्ड टॉवरमध्ये बंटी सिंग याच्या रिअल इस्टेट कंपनीत काम करायची. रागिणीनेच बंटी सिंहसोबत अनैतिक संबंध होते. बंटीच्या पत्नीला याबाबत माहिती होती. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. सगळं संपत असल्याचे पाहून बंटीच्या पत्नीने रागिणीच्या हत्येची योजना आखली आणि भावाला त्यामध्ये सामील करुन घेतले. अमितने त्याच्या मित्रांना या कटामध्ये सहभागी करुन घेतले.

कशी केली हत्या?

2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अमित रागिणीच्या घरी पोहोचला होता. त्याने गाडीत बसूनच रागिणीला बोलावून घेतले आणि सोबत यायला सांगितले. रागिणीने घरी बंटीच्या पत्नीने बोलवलं आहे असं सांगितले आणि ती निघाली. त्यानंतर अमित रागिणीला घेऊन हिंडन नदीच्या पुलावर घेऊन गेला. त्यावेळी आपल्यासोबत काय होणार आहे याची कल्पना रागिणीला आली. त्यामुळे ती पळू लागली. मात्र तितक्यात अमितने रागिणीवर गोळीबार केला. रागिणीचा मृत्यू झाल्यानंतर अमितने तिचा मृतदेह पुलाखाली फेकून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *