मोदींच्या हस्ते ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे रविवारी उद्घाटन, महाराष्ट्रातील ४४ स्थानके

रेल्वे मंत्रालयाने देशातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमृत भारत’ या योजनेंर्तगत टप्प्या-टप्प्याने हा कायापालट करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ ऑगस्टला ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची पायाभरणी करतील. देशातील स्थानकांच्या पुर्नविकासासाठी अंदाजे २४ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.

देशात वाहतुकीसाठी रेल्वे हे नागरिकांच्या पसंतीचे साधन आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी करत आहेत. आता ‘अमृत भारत’ योजनेंर्तगत १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास केला जाईल. त्यात रेल्वे स्थानकांवर प्रतीक्षाकक्ष, शौचालये, स्थानिक उत्पादन विक्री सुविधा, मोफत वाय फाय, एक स्टेशन एक उत्पादन, परिसर सुशोभीकरण, वाहतूक सुधारणा आदी कामे होणार आहेत.

पंतप्रधान मोदी रविवारी ( ६ ऑगस्ट ) दूरदृष्यप्रणालीद्वारे सुरुवातीला ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची पायाभरणी करतील. त्यात आंध्र प्रदेशातील १८, आसाममधील ३२, बिहारमधील ५०, छत्तीसगढमधील ७, नवी दिल्लीतील ३, झारखंडमधील २०, कर्नाटकातील १३, केरळातील ५, मध्य प्रदेशमधील ३४, महाराष्ट्रातील ४४, मेघालय आणि नागालँडमधील प्रत्येकी १, ओडिशातील २५, पंजाबमधील २२, राजस्थानमधील ५५, तामिळनाडूतील १८, तेलंगणातील २१, त्रिपूरातील ३, जम्मू-काश्मीरमधील ५, पुडुचेरीमधील १, उत्तर प्रदेशातील ५५, उत्तराखंडमधील ३, पश्चिममधील बंगालमधील ३७ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *