मुंबईत भररस्तात एक थरार घडला आहे. कौटुंबिक वादातून भररस्त्यात पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पती फरार झाला असून पोलिस याचा शोध घेत आहेत.
मुंबईच्या खारमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका माथेफिरु पतीने आपल्या पत्नीवर भररस्त्यात चाकूने हल्ला केला आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिला स्थानिकांनी तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहेत. रविवारी रात्री 8 वाजता ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा त्याच्या पत्नीसोबत धारावी येथे राहत होता. लग्न झाल्यापासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. घटस्फोट घेण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज देखील केला होता. रविवारी रात्री दोघेही बाहेर असताना त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. या वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात पत्नीच्या गळ्यातून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. आणि ती तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. रस्तावरुन जात असलेल्या नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात नेले.
आरोपीची पत्नी ही कामानिमित्त धारावीच्या शाहू नगर परिसरातून खार इथे गेली होती. यावेळी तिचे पतीसोबत भांडण झाले. यावेळी त्यांच्यातील वाद हा टोकाला गेला. त्यामुळं त्याने रागाच्या भरात पत्नीवर हल्ला केला, असे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.
पत्नीवर वार कर आरोपीने तिथून पळ काढला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, पतीने पेपर कटरच्या सहाय्याने पत्नीवर वार केला आहे. आधीपासूनच त्याने हल्ल्याचा कट रचला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
