मालाड पश्चिम येथील मार्वे किनाऱ्यावर रविवारी पाच मुले बुडाली होती. त्यापैकी दोघांना स्थानिक मच्छीमारांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र तीन मुलांचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. अखेर सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिन्ही मुलांचे मृतदेह समुद्रात सापडले.
मालाड पश्चिम परेरा वाडी, शंकर मंडळाजवळ मालवणी येथे राहणारी पाच मुले मार्वे किनारी पोहोण्यासाठी गेली होती. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाच मुले सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बुडाली. त्या वेळी तेथे उपस्थित मच्छीमारांनी धाव घेत मुलांना वाचवण्याचे प्रयत्न केले. दोन मुलांना वाचवण्यात मच्छीमारांना यश आले, तर तीन बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दल, नौदल यांच्या पथकांना पाचारण करण्यात आले. सोमवारी तिघांचेही मृतदेह समुद्रकिनाऱ्याजवळ सापडले. दरम्यान, या घटनेची स्थानिक पोलीस व मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
मृतांची नावे..
१) अजय जितेंद्र हरिजन (वय १४ वर्षे)
२) शुभम राजकुमार जयस्वाल (वय १४ वर्षे)
३) निखिल साजी कायमपुर, वय (१४ वर्षे)
