डोंबिवलीत रस्त्यांची चाळण; खड्ड्यांमुळे वाहने बंद पडणे, कंबर, पाठ दुखीचे आजार

डोंबिवली शहराच्या पूर्व, पश्चिम भागातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांवरुन प्रवास करताना रिक्षा, दुचाकी वाहने आपटत असल्याने बंद पडत आहेत. रिक्षा, दुचाकी स्वारांना खड्डेमय रस्त्यावरुन सतत येजा करुन पाठ, कंबर दुखीचा त्रास सुरू झाला आहे.

 डोंबिवली, कल्याणमध्ये खडडे भरणीची कामे सुरूच आहेत, असा दावा शहर अभियंता, बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. तरीही ठेकेदाराकडून पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात टाळाटाळ केली जात आहे. पावसाळापूर्वीची खड्डे भरणीची कामे ठेकेदारांनी सुस्थितीत न केल्याने पाऊस सुरू झाल्यानंतर सततच्या वाहन वर्दळीमुळे डोंबिवलीतील बहुतांशी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

खड्ड्यांमुळे वाहने हळू चालविली जात असल्याने शहरात वाहन कोंडी होत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरुन सतत येजा केल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना पाठ, कंबर दुखीचा त्रास सुरू झाला आहे. सतत खड्ड्यात रिक्षा आपटून रिक्षेचे भाग सुट्टे होत आहेत. रिक्षा प्रवासी वाहतूक करताना बंद पडते. त्याचा फटका आठवड्यातून दोन ते तीन वेळा रिक्षा चालकांना बसतो.

डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली पुलावरुन उजवे वळण घेऊन गणेशनगर भागाकडे जाताना पेट्रोल पंप रस्त्यावर खड्ड्यांच्या रांगोळ्या तयार झाल्या आहेत. ठाकुर्ली पूर्व भागातील बँक ऑफ महाराष्ट्र, हनुमान मंदिर रस्त्यावरील रस्त्याची चाळण झाली आहे. या अरुंद रस्त्यावरुन शाळेच्या बस, अवजड वाहने येजा करतात. त्यामुळे दुपार, संध्याकाळच्या वेळेत या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. डोंबिवलीतून कल्याणला जाण्याचा हा मधला मार्ग आहे. वाहन चालक या रस्त्याला सर्वाधिक पसंती देतात. ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या पूर्व बाजुला उताराला मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्याखाली जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला गळती लागल्याने ते पाणी रस्त्यावर येते. या भागात मोठे खड्डे पडले आहेत. स. वा. जोशीच्या प्रवेशव्दार ते गणेशमंदिरापर्यंत रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

जोशी, ब्लाॅसम शाळेतील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालक सकाळ, दुपार, संध्याकाळ याठिकाणी येतात. बहुतांशी पालक दुचाकीवरुन मुलांना घेऊन जातात. जोशी शाळेसमोरुन प्रवास करताना वाहन चालकांना खड्ड्यांमुळे कसरत करावी लागते. शाळांकडे जाणाऱ्या बहुतांशी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पालिकेने विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही यादृष्टीने या रस्त्यांची तातडीने देखभाल करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण वाढण्यापूर्वीच पालिकेने खड्डे पडलेल्या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजविले जातील यादृ्ष्टीने प्रयत्न करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *