मित्राला घरी सोडून परतताना वाटेतच घात; रस्त्यावर पडलेल्या विद्युत तारांच्या धक्क्याने तरुणाचा अंत

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युत वाहक तारांमध्ये दुचाकी अडकल्याने विजेचा धक्का तरुणाला बसल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे ही घटना घडली आहे.

विश्वनाथ चौरंग चव्हाण (वय २८) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. विश्वानाथ हा त्यांच्या कुटुंबातील एकमेव आधार असल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे हा प्रकार घडला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विश्वनाथ हा शेती व्यवसायासोबतच हमालीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी रात्री कांद्याची गाडी भरण्यासाठी गेला होता. कांद्याची गाडी भरून दिल्यानंतर तो मित्राला त्याच्या घरी सोडून परत येत असताना रस्त्यावर अगोदरच विद्युत वाहक तार तुटून पडलेली होती. रस्त्यावरील विद्युत तारेत त्याची दुचाकी अडकली. त्या विद्युत तारेतून विजेचा प्रवाह त्यावेळी सुरू होता. त्यामुळे विश्वनाथला विजेचा धक्का बसला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याच्या कुटूंबियांना आणि शिरूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसेच महावितरण अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळेच युवकाचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटण्याचे प्रमाण अधिक आहे. महावितरण विभागाचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा बळी गेल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *