भीमा नदीत पोहण्यासाठी गेली अन् दिसेनाशी झाली; दोन मुलं बेपत्ता, शोधूनही सापडेना

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे भीमा नदीत पात्रात पोहण्यासाठी गेलेली दोन मुलं नदी पात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

अनुराग विजय मांदळे ( वय १६) आणि गौरव गुरुलिंग स्वामी ( वय १६) अशी भीमा नदीत बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

कोरेगाव भीमा येथे भीमा नदीच्या पाण्यामध्ये आज दुपारच्या सुमारास काही मुले पोहण्यासाठी गेली होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नदी पात्रात पोहत असताना अनुराग आणि गौरव यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या सोबत आलेल्या मुलांनी आरडाओरड केली. त्यामुळे जवळ शेतात काम करत असलेले नागरिक धावत घटनास्थळी आले. मात्र, तोपर्यंत दोन्ही मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ती बुडाली आणि दिसेनाशी झाली होती, अशी माहिती मिळाली आहे.

या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यात स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने पाण्यामध्ये बुडालेल्या दोन्ही मुलांचा शोध घेतला. मात्र अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता. दोन मुले पाण्यात बुडाल्याची बातमी गावात पसरताच नागरिकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली होती. घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांकडून शोध कार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *