मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने मंत्र्यांच्या पायांतील बूट काढण्याच्या घटनेवरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. राज्याचे पर्यटन मंत्री रचपालसिंह यांच्याबाबत हा प्रकार घडला.
प्रख्यात शिल्पकार रामकिंकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नबाना येथे झालेल्या सरकारी कार्यक्रमात ही घटना घडली. रचपालसिंह यांचा गणवेशातील सुरक्षारक्षक त्यांच्या पायांतील बूट काढून पुन्हा त्यांच्या पायांत चढवित असल्याचे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील दृश्यांत दिसले. रामकिंकर यांच्या तैलचित्राला मंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करण्याच्या कार्यक्रमापूर्वी हा प्रकार झाला. याचा फायदा विरोधकांनी लगेच घेतला आणि रचपालसिंह यांच्या जमीनदारी मनोवृत्तीवर या घटनेतून प्रकाश पडत असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मानस भुईयां यांनी केली. रचपालसिंह माजी पोलिस अधिकारी असल्यामुळे कनिष्ठांना अशी वागणूक देणे त्यांना नवे नसल्याचे माकपचे माजी खासदार सुजन चक्रवर्ती यांनी सांगितले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकाराची दखल घेतली असून, घडलेल्या घटनेबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करण्यास रचपालसिंह यांना सांगितले आहे.