प्रसूतीवेदना टाळण्यासाठी दिल्या जाणा-या वेदनाशामक औषधांवर महिला अधिक अवलंबून राहतात. त्यामुळे या महिलांचा कल नैसर्गिक प्रसूतीपेक्षा शस्त्रक्रियेद्वारे होणा-या प्रसूतीकडे अधिक वाढल्याचे समोर आले आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २००७-०८ या वर्षात मुंबईत एकूण १,४४,६३३ महिला प्रसूत झाल्या असून त्यातील २६,५३७ प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, २०१४-१५ या वर्षात मुंबईत १,७४,०७४ प्रसूती झाल्या असून त्यातील ५०,७९३ प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे झाल्या आहेत.
त्यामुळे प्रसूतीवेदना टाळण्यासाठी महिला शस्त्रक्रियेचा पर्याय निवडत असल्याने नैसर्गिक प्रसूतीच्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. मागील २००७ ते २०१५ या आठ वर्षात मुंबईतील बहुतांश प्रसूती या शस्त्रक्रियेद्वारे झाल्या असून त्या सरकारी रुग्णालयात करण्यात आलेल्या आहेत. केईएम, शीव, नायर या पालिकेच्या विविध १६ रुग्णालयांत तसेच खासगी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती होत आहेत. तसेच २०१०-११ या वर्षात १,४७,०४९ महिलांची नैसर्गिक प्रसूती करण्यात आली होती. परंतु कालांतराने या आकडय़ात घट झाली.
२०१०-११च्या तुलनेत हा आकडा घसरून २०१४-१५ या वर्षात १,१५,५२९ झाला आहे. अवघ्या तीन-चार वर्षात ही घट झालेली दिसून येत आहे. मुळात बदलत्या दैनंदिन जीवनशैलीमुळे नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक असणारे ऑक्सिटोसिन हार्मोन गर्भवती महिलांच्या शरीरात निर्माण होण्यात खंड पडतो. या विविध कारणांमुळे नैसर्गिक प्रसूती होण्याची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे, असे हिरानंदानी रुग्णालयाच्या डॉ. अनिता सोनी यांनी सांगितले.
नैसर्गिक प्रसूतीत होणारी घसरण याबाबत बोलताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. बंदिता सिन्हा म्हणाल्या की, सध्याच्या स्पर्धात्मक युगात करिअरच्या मागे धावताना तरुणी उशिरा लग्न करतात. त्यामुळे वाढत्या वयामुळे त्यांच्या शरीरात अनेक वैद्यकीय समस्या उद्भवतात. मुळात २० ते २५ हे वय प्रसूती कालावधीसाठी अतिशय उत्तम आहे.
परंतु हल्ली उशिरा लग्न होत असल्याने तिशी ओलांडल्यानंतर तरुणी गर्भधारणेचा विचार करतात. या वयात प्रसूतीवेदना सहन करणे अशक्य असल्याने संबंधित महिला किंवा त्यांचे नातेवाईक शस्त्रक्रियेचा मार्ग स्वीकारतात.
तसेच अधिक त्रास सहन करू न शकल्याने आम्ही प्रसूतीच्यावेळी औषधे किंवा इंजेक्शन देतो. मात्र, त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागत नाही. मुळात इंजेक्शन देऊनही प्रसूतीवेदना या महिला सहन न करू शकल्यास शेवटी आम्ही शस्त्रक्रिया करतो, असेही डॉ. सिन्हा यांनी सांगितले.