संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात चीनच्या घुसखोरीचा मुद्दा जोरदार गाजला आहे. विरोधकांनी संसदेत यावर जोरदार आक्षेप घेत चीनच्या घुसखोरीवर चर्चा करण्याची मागणी केली. तसेच कोरोना रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार अलर्टवर आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजच अधिवेशन संपण्याची चिन्हं आहे. त्यामुळे आठवडाभर आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळणार अशी चर्चा सुरु आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन पुढे चालू ठेवण्यात येणार नाही, अशी चर्चा
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन पुढे चालू ठेवण्यात येणार नाही, अशी चर्चा सुरु आहे.आठवडाभर आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळणार, असे बोलले जात आहे. काल संसद परिसरात मास्कचा वापर लागू केला होता. तर कोरोना रूग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार अलर्टवर आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही कोरोना संदर्भात बैठक घेतली. यात कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारची सक्त पावले उचण्याचे संकेत दिले आहे. त्याअंतर्गत एक आठवडा आधीच संसद अधिवेशन संपण्याची शक्यता आहे.
भारतातही कोरोनाची संख्या वाढतेय, दिल्लीत कोरोनाने एकाचा मृत्यू
चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाची संख्या वाढत आहे. दिल्लीत कोरोनाने एकाचा मृत्यू झाला. कोरोना वाढत आहे. तर दुसरीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चीनी घुसखोरी मुद्यावरुन सुरु असलेला गदारोळ पहाता हे अधिवेशन मुदतीपूर्वी म्हणजे या कामकाजी आठवड्याच्या अखेरीस गुंडाळाण्यात येण्याची शक्यता आहे. तशी जोरदार चर्चा संसद भवनाच्या परिसरात आहे.
तवांग येथे केलेल्या घुसखोरीच्या मुद्याने संसदेत तापला
चीनने 8 आणि 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे केलेल्या घुसखोरीच्या मुद्याने संसदेत वातावरण चांगलेच तापले. चीनची कुरापतही सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्यावर सरकारने त्याची कबुली दिली. कॉंग्रेससह विरोधकांनी जोरदार हरकत घेतल्यानंतर राज्यसभेसह दोन्ही सदनात सरकारने यावर निवेदन दिले, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. या मुद्यावर संसदेत चर्चा करावी यासाठी गेला संपूर्ण आठवडा विरोधकांनी राज्यसभा दणाणून सोडली.
दरम्यान, अधिकृत आकडवारीनुसार संसद अधिवेशना दरम्यान सभागृह चालवण्यासाठी दर तासाला 1 कोटी 60 लाख रुपये खर्च येतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या चीन मुद्यावर मोदी सरकार लवपवाछपवीचे धोरण सोडून चर्चा करत नाही तोवर कामकाज सुरळीत चालणे अशक्य असल्याची विरोधकांची भूमिका आहे. मात्र, चर्चेतून पळ काढण्यासाठी अधिवेशन गुंडाळण्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी खासदारांमध्ये अशीही चर्चा आहे की, आधीच अधिवेशन कमी कालावधीसाठी बोलावण्यात आले असताना लवकर स्थगित केले तर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.
