आईने वयाची ४५ वर्षे पूर्ण केल्याने तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येत नाही तर मग आईऐवजी मुलाचे नाव समाविष्ट करून शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी द्या, असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) राज्य राखीव पोलिस दलाला दिले. लिकेश भागवत बांद्रे, असे याचिकाकर्त्याचे नाव आहे.
लिकेशचे वडील भागवत बालक्रिष्ण बांद्रे हे एसआरपीएफमध्ये कार्यरत होते. भागवत यांचा २३ जानेवारी २००८ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी मंदा भागवत बांद्रे यांनी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला. २०१३मध्ये मंदा यांनी एसआरपीएफकडे अर्ज करून त्यांचा मुलगा लिकेश याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, असा दुसरा अर्ज केला. या अर्जावर एसआरपीएफने कोणताही निर्णय घेतला नाही. १५ मार्च २०२२रोजी मंदा यांना वयाचे ४५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे लिकेश यांनी ॲड. नाझिया पठाण व ॲड. मंगेश राऊत यांच्यामाध्यमातून मॅटमध्ये धाव घेतली. या याचिकेवर न्या. मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर मॅटने एसआरपीएफ कमांडंटचा १५ मार्च २०२२ रोजीचा आदेश रद्द करून याचिकाकर्त्याचे नाव अनुकंपा यादीत समाविष्ट करावे व नियानुसार नोकरी द्यावी, असे आदेश दिले.
