आता बातमी आहे मुंबईकरांच्या कामाची…दिवसेंदिवस महागाईचा वाढता दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं असताना आता मुंबईकराच्या महिन्याच्या बजेटला फटका बसणार आहे. कारण मुंबई महापालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांचं पाणी महागलं आहे. हो, मुंबईकरांना आता पाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पाणीपट्टी दरवाढीला मंजुरी दिला आहे.
पाणी पट्टीत वाढ का?
गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईकरांवरील पाणी दरवाढीचं संकट टळलं होतं. कोरोना महामारीमुळे मुंबई महापालिकेने पाणी दरवाढीचा निर्णय घेतला नव्हता. अखेर आता मुंबईकरांच्या खिशाला चोट बसणार आहे. कारण मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तेव्हा आता हजार लीटरमागे मुंबईकरांना 35 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत.
कोणाला किती पैसे मोजावे लागणार? (प्रतिहजार लिटर)
झोपडपट्ट्या, चाळी, कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाडे – 4.76 पैसे
झोपडपट्ट्यातील निवासी जलजोडण्या, प्रकल्पबाधित इमारती – 5.28 पैसे
व्यावसायिक ग्राहकांसाठी – 46.75 पैसे
बिगर व्यापारी संस्था – 25.46 पैसे
उद्योगधंदे, कारखाने – 63.65 पैसे
बाटलीबंद पाणी कंपन्या – 132.64 पैसे
बेस्टचा ही मुंबईकरांना दणका
मुंबईकरांना बेस्टनं धक्का दिलाय.. बेस्टच्या विद्युत विभागानं ग्राहकांना दोन महिन्याच्या बिलाची अनामत रक्कम भरण्याचं पत्र पाठवलंय… 26 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना ही रक्कम भरावी लागणार आहे.. सुरक्षा अनामत रक्कम ही नवीन वीज जोडणीच्या वेळी घेतली जाते. मात्र बेस्टने दोन महिन्यांच्या मासिक वीज बिलाची अतिरिक्त अनामत रक्कम घेण्याचा निर्णय घेतल्यानं ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या निर्णयाचा 10 लाख ग्राहकांना फटका बसणार आहे.. हा निर्णय बेस्टनं मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसनं बेस्टला दिलाय.
