सकाळ सकाळ रेल्वेनं प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा….

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं  गुरुवारची सुरुवातच अडचणींनी झाली आहे. जुईनगर रेल्वे स्टेशन येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं तूर्तास मुंबई  ते वाशी पर्यत लोकल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. तर, वाशी पनवेल लोकल बंद असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या घडीला यंत्रणेत दुरुस्तीचे काम तातडीनं हाती घेण्यात आले असून, साधारण दहा ते  15 मिनिटांत काम  पूर्ण होण्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. दरम्यान, या अडचणीमुळे सकाळी पनवेल, खारघर, बेलापूर, सानपाडा भागातून मुंबई गाठणाऱ्यांचे हाल होत आहेत.

वाशी ते पनवेल ही रेल्वे सेवा पहाटेपासूनच ठप्प असल्यामुळं अनेकांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिथे ठाणे- पनवेल मार्गावरही याचे परिणाम झाले असून, तिथंही रेल्वेसेवा ठप्प आहे. परिणामी प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढतच चालली आहे.

नोकरदार, विद्यार्थ्यांची तारांबळ 

रेल्वे मार्गानं प्रवास करत मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या आणि नोकरीसाठी सकाळच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्यांची या गैरसोयीमुळं मोठी तारांबळ उडाली आहे. इतकंच नव्हे, तर यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या दिशेनं निघालेल्या विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पहाटेपासूनच रेल्वेसेवा ठप्प असल्यामुळे आता पर्यायी मार्गांअभावी प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *