हापूस आंब्याचं नाव जरी काढलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. पुढच्या वर्षी कधी एकदा आंबे येतायत याची आपण वाट पाहत असतो. त्यामुळे आंब्याच्या बद्दलची कुठलीही बातमी ऐकली की आपले कान आपण टवकारतो. आंबेप्रेमींसाठी खुशखबर आहे. मुंबईत आंबे लवकर यावेत म्हणून रत्नागिरीहून निघणारी कंटेनर ट्रेन धावणार आहे. हे ट्रेन पाहिली असेल. रत्नागिरी ते मुंबईतील जेएनपीटी बंदरा पर्यंत मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून कंटेनर ट्रेन सुरू करण्यात येत आहे.
सुरक्षित प्रवास आणि वेळेची बचत असा दृष्टिकोन रेल्वेप्रशासनाने ठेवला असून पहिली कंटेनर ट्रेन आज रत्नागिरी रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणार आहे कोकणात उत्पादित उत्पादने मुंबईतील जेएनपीटी बंदरातून जगाच्या विविध भागात निर्यात केली जातात. कोकणातील उत्पादनेही त्यांच्या गुणांसाठी ओळखली जातात. त्यामुळेच येथील उत्पादनाला जगभरात प्रचंड मागणी असते.
काय घेतला निर्णय :
जेएनपीटी आणि उत्पादन युनिट्स मधील रस्ता खराब असल्यामुळे त्यावरुन वाहतूक करताना दमछाक होते. आणि वेळही अधिक लागतो. तसेच रस्ते अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.त्यामुळे जेएनपीटी आणि रत्नागिरी दरम्यानचा हा प्रवास सुरळीत करण्यासाठी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागाने अजून एक पाऊल पुढे टाकत कंटेनर ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या ट्रेनमध्ये चाळीस फूट आणि वीस फूट लांबीचे कंटेनर मालाच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले गेले आहेत. मालाची वाहतूक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी कोकण रेल्वेची ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. कोकणातून होणाऱ्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून. पहिली कंटेनर ट्रेन आज रत्नागिरी स्थानकातून रवाना करण्यात येणार आहे. या कंटेनर ट्रेनचा फायदा रत्नागिरीसह आजूबाजूच्या जिल्ह्यांना देखील होणार आहे. तसेच कोकणातून निर्यातीसाठी मासळी मोठ्या प्रमाणात जेएनपीटी बंदराकडे पाठविली जाते.
वातानूकुलित कंटेनर :
त्यासीठी वातानुकूलित कंटेनरही कोकण रेल्वेकडून उपलब्ध करून दिले गेले असून त्याचा फायदा व्यावसायिकांना होणार आहे.त्याच प्रमाणे भविष्यात आंबा व्यवसायिकांना देखील या ट्रेनचा फायदा होणार आहे. एकूणच काय व्यवसायाला चालना मिळण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेचा हा निर्णय नक्कीच स्वागताहार्य आहे. आंबा खाण्यासाठी आता आपल्याला अनेक सवलती मिळू लागल्या आहेत त्यापैंकीच ही एक आहे. त्यामुळे सध्या मुंबईकरांसाठी ही चांगलीच पर्वणी ठरणार आहे.
