गोवराचा उद्रेक वाढत असून, आतापर्यंत या संसर्गामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात १२ बालकांना जीव गमवावा लागला. मृत्यूंचे निश्चित निदान झालेल्या बालकांची संख्या आठ असून एक संशयित मृत्यू आहे, तर तीन मृत्यू हे मुंबईबाहेरील आहेत. दरम्यान, ठाणे शहरात पाच रुग्णांना गोवराची बाधा झाल्याचे समोर आले.
भिवंडी येथील आठ महिन्यांचा बाळाचा बुधवारी मृत्यू झाला. या बाळाला १८ नोव्हेंबर रोजी ताप येत होता, त्याच्यामध्ये गोवराची लक्षणे दिसत होती. त्याला लशीचा एक डोस देण्यात आला होता. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून ५७ मिनिटांनी त्याला पालिका रुग्णालयात दाखल करून श्वसनाचा त्रास होत असल्याने उपचार सुरू करण्यात आले. २२ नोव्हेंबर रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
