नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यामधील भारतीय सैन्यामध्ये भरती झालेल्या तरूणीला वीरमरण आलं आहे. वयाच्या 23 व्या वर्षी गायत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे. शहीद गायत्रीची निवड झाल्यावर ती बिहारच्या अररिया जिल्ह्यातील बथनाहा येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होती. मात्र राजस्थानमधील अलवर येथे प्रशिक्षण घेत असताना तिच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
प्रशिक्षणावेळी गायत्री खड्ड्यात पडली त्यावेळी तिच्या डोक्याला दुखापत झाल्याने जखमी झाली होती. जखमी झाल्यावर तिच्यावर जयपूर इथं शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर ती पुन्हा प्रशिक्षणसाठी रुजू झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ती बिहारच्या बथनाहा इथे कर्तव्यावर रुजू झाली. मात्र तिथे तिला त्रास जाणवू लागल्याने ती सुट्टी घेऊन घरी आली. मुंबई आणि नाशिक दोन्ही ठिकाणी तिने उपचार घेतले.
उपचार घेऊनही तिची प्रकृती सुधारत नसल्याने तिला दिल्लीला घेऊन जाणार होते. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला. गायत्रीची घरची परिस्थिती हालाखिची असून असून तिला चार बहिणी आहेत. इतक्या कमी वयात गायत्रीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर मोठा दु: खाचा डोंगर कोसळला आहे. गायत्रीच्या मृत्यूची बातमी समजताच निफाड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

