राज्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशात नाशिकच्या अंबड परिसरात राहणाऱ्या सराईत गुन्हेगार अक्षय जाधवचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री डोक्यात कोयत्याचा वार करत हल्ला करून अक्षय जाधवचा खून केल्याचा प्रकार घडला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व वैमान्यातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे. खरंतर, अक्षयची पार्श्वभूमीच गुन्हेगारीची आहे. त्यामुळे या घटनेत नेमकं काय घडलं याचा पोलीस सध्या तपास करत असून यामध्ये दोन संशयितांना एका रात्रीत अटक करण्यात आल्याचीही माहिती आहे. तन्मय गोसावी आणि आकाश साळुंखे अशी संशयतांची नावं आहे.
रात्री साडेदहा वाजायच्या सुमारास संशयित तन्मय मनोज गोसावी आणि आकाश अनिल साळुंखे हे महालक्ष्मी नगरमध्ये शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर बसले होते. तिथे अक्षय उत्तम जाधव हा त्याच्या साथीदारांसह आला. यावेळी या दोघांमध्ये वाद झाला असता संशयित तन्मय गोसावी यांने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षयच्या डोक्यात वार केले. यामध्ये गंभीर इजा झाल्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान मयत अक्षय जाधव विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचे, शासकीय नोकऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, घरपोडी असे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या घटनेत नेमकं काय घडलं याचा पोलीस सखोल तपास करत असल्याची माहिती आहे.
