कोल्हापुरातील हातकणंगले येथे एका तृतीयपंथीयावर लग्नाचे आमिष दाखवत अनैसर्गिक अत्याचार करुन आर्थिक लुबाडणूक करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची तक्रार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून संशयित ऋषिकेश बबन परमाज (रा.हेरले, ता.हातकणंगले) याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी तृतीयपंथी पीडिता या हातकणंगले येथील कबनुर येथे आपल्या परिवारासह राहतात. २०१८ मध्ये इचलकरंजी येथे संशयित आरोपी ऋषिकेश परमाज याच्याशी फिर्यादी यांची ओळख झाली आणि नंतर कालांतराने प्रेमसंबंध सुरु झाले. ऋषिकेशने लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध फिर्यादीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ९ जुलै रोजी अथणी जि. बेळगाव येथील एका मंदिरात दोघांनी लग्न केल्यानंतर वकिलांकडून कायदेशीर कागदपत्रे तयार केली. दोघांचाही एकत्र संसार सुरु असताना त्याने कामधंद्यासाठी साडेतीन लाख रुपये घेतले. तर १७ ऑगस्ट रोजी जयसिंगपूर येथे त्याने सोन्याचे दागिने हिसकाऊन तेव्हाही अनैसर्गिक अत्याचार केला.
यावेळी त्याच्यासोबत त्याचे इतर दोन साथीदार देखील होते. मारहाण करुन कोणास न सांगण्याची धमकी देत त्यांनी घरी सोडले, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, तृतीयपंथीयाने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुखांना तक्रार अर्ज दिला असून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून आपल्याला अपशब्दांसह अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. तसेच पोलिसांनी आपली वैद्यकीय तपासणी केली नसल्याचा आरोपही या फिर्यादीने अर्जात केला आहे.
