रेशनिंगच्या तांदळाची वाट ‘चुकली’; मुंब्य्राऐवजी रेशनिंगचा २० टन तांदूळ पोहोचला भिवंडीमध्ये

मुंब्रा येथील रेशनिंग दुकानांमध्ये तांदळाचे वितरण करण्याऐवजी तांदळाने भरलेले दोन टेम्पो चक्क भिवंडीला नेण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटने भिवंडीतील रांजनोली नाका येथे टेम्पो पकडत टेम्पोमधील तब्बल २० टन तांदळाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली होती. तर, एकाने न्यायालयात शरणागती पत्करली होती. वाट चुकल्याने भिवंडीला आल्याचे चालकाचे म्हणणे असले तरी हा तांदूळ भिवंडीला नेण्याबाबत अगोदरच निर्देश देण्यात आले होते. शिवाय, टेम्पोमधून कोणत्या ठिकाणी तांदूळ रिकामी करायचा आहे, ते ठिकाणही सांगितले जाणार होते, अशी माहिती चौकशीमध्ये समोर आली आहे.

कळंबोली येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एफसीआय) गोदामातून तांदूळ गाड्यामध्ये भरून या तांदळाचे वाटप विविध रेशनिंग दुकानांमध्ये केले जाते. भिवंडी येथेही एफसीआयचे गोदाम असून तुर्भेला भारतीय वखार महामंडळाचे गोदाम आहे. अन्नधान्याच्या वाहतुकीसाठी शासनाकडून अधिकृत कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रेशनिंगच्या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आल्याने गाडीचे लोकेशनही कळते. गोदामातून अन्नधान्य घेऊन निघालेली गाडी रेशनिंग दुकानापर्यंत जाते की नाही किंवा अन्य कोठे गेली, याबाबत तात्काळ समजते. शिवाय, रेशनिंगच्या गाड्यांचा रंग हिरवा असून या गाड्यांचे वाहतुकीचे मार्ग ठरलेले आहेत. त्याच मार्गावरून गाड्या जाणे आवश्यक आहे. काही अपरिहार्य कारणास्तव अन्य मार्गावरून गाडी घेऊन जायची असल्यास रेशनिंगच्या अधिकाऱ्यांना कळवणे आवश्यक आहे. गोदामातून धान्याची उचल करण्यापासून ते लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्यापर्यंत रेशनिंगची अत्यंत कडक व्यवस्था असतानाही तांदळाने भरलेले दोन टेम्पो मुंब्य्राऐवजी थेट भिवंडीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एफसीआयच्या कळंबोली येथून निघालेल्या दोन टेम्पोपैकी एका टेम्पोमध्ये ८ हजार ८९५ किलो तांदळाचा साठा होता. एकूण ५० किलोच्या १८० गोण्या होत्या. तर, दुसऱ्या टेम्पोमध्ये १० हजार ८७२ किलो तांदूळ होता. तर, गोण्यांची संख्या २२० होती. दोन्ही टेम्पोमधील तांदळाचे एकूण वजन २० टन असून किंमत ७ लाख २५ हजार ४७० आहे. परंतु, टेम्पोमधील तांदळाचे वितरण मुंब्रा येथील रेशनिंग दुकानांमध्ये करणे आवश्यक असताना टेम्पो चक्क भिवंडीमध्ये आले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटने रांजनोली नाका येथे दोन्ही टेम्पो पकडत टेम्पोमधील तांदळाचा सर्व साठा जप्त केला. तसेच, टेम्पो चालकांना ताब्यात घेतले. टेम्पोच्या मालकाने हा तांदूळ एका संस्थेचा असून तांदूळ भिवंडीला घेऊन जाण्याविषयी सांगितले होते. तांदूळ ज्या ठिकाणी रिकामी करायचा आहे ते ठिकाण कळवण्यात येईल, असेही सांगितले होते. त्यानुसार तांदळाचा साठा भिवंडीला घेऊन आल्याची कबुली चालकांनी दिली.

या प्रकरणी रेशनिंगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर टेम्पोमालकासह दोन चालक आणि अन्य एक अशा एकूण चौघांविरुद्ध नुकताच कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मुंब्रा येथील रेशनिंग दुकानामध्ये तांदूळ वितरित करणे आवश्यक असतानाही नियोजित मार्गावरून टेम्पो नेण्यात आला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने दोन्ही चालकांना अटक केली होती. त्यांना जामीनही मिळाला असून दोन्ही टेम्पोही जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयात शरणागती पत्करणाऱ्या टेम्पो मालकाचीही जामिनावर सुटका झाली आहे. रस्ता चुकल्याने भिवंडीला आल्याचे चालकांचे म्हणणे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत गुन्हे शाखेकडून सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.

मुंब्रा परिसरातील जवळपास १५ ते १६ रेशनिंग दुकानांमध्ये तांदळाचे वितरण करणे आवश्यक होते. मात्र, टेम्पो परस्पर भिवंडीला गेला. टेम्पोमध्ये जीपीएस यंत्रणा असल्याने टेम्पोचे लोकेशन आम्ही बघतो. मात्र, हा सर्व प्रकार रात्री घडल्याने रात्री टेम्पोचे लोकेशन बघता आले नाही. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यालयाला अहवाल सादर केला असल्याची माहिती रेशनिंगच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *